15/01/2016
स्मार्ट सिटीकडे कल्याण डोंबिवलीची वाटचाल सुरु
दुर्गाडी समांतर पुल, मोठागाव – मानकोली पुलाच्या कामांना अंतिम मंजूरी
कल्याण – डोंबिवलीकरांचा प्रवास होणार वेगवान
कल्याण डोंबिवली या शहरांना स्मार्ट सिटी करण्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले वचन प्रत्यक्षात येण्यास सुरुवात झाली आहे. या शहरांमधील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले कल्याण येथील दुर्गाडी समांतर पुल आणि डोंबिवली पश्चिमेतील मोठागांव ते भिवंडीतील मानकोली पर्यंतच्या महत्वाकांक्षी पुलाच्या कामाला आज दिनांक १४ जानेवारी, २०१५ रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने मंजूरी दिली. स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती श्री. संदीप गायकर यांनी ही माहिती दिली.
दुर्गाडी किल्ला परिसरातील खाडीवर होणारा समांतर पुल हा २५ मीटर रुंद व ३८० मीटर लांब असेल. त्यावर ७६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कल्याण पश्चिमेत आग्रा रोड तसेच कल्याण – नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर दुर्गाडी किल्ला भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या या पुलामुळे निकाली निघेल. मोठागांव –मानकोली येथील पुल १२२५ मीटर लांब व २७.५ मीटर रुंद असेल, या पुलाच्या कामावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण २२३ कोटी रुपये खर्च करणार आहे. हा पुल पूर्ण झाल्यावर डोंबिवली येथून ठाण्यापर्यंतचा प्रवास अवघ्या १० ते १५ मिनिटांत करता येणार आहे.
सध्या कल्याण, डोंबिवलीत जागोजागी वाहतूक कोंडीची समस्या उदभवते. त्यामुळे रस्ता रुंदीकरण करतांनाच नव्या पुलांच्या कामांनाही वेग आला आहे. या कामांचा आदेश आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने संबंधित कंत्राटदारांना देउन सुमारे एक महिन्याच्या आत मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पांचे भूमीपुजन केले जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती संदीप गायकर यांनी दिली.