31/05/2026
निशब्द..
आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती.
“अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते...? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आलोय... चूल, स्वयंपाक, झाडू-पोछा... एवढंच ना! आणि वरून तिचं हे दुखतं, ते दुखतं... नाटकच चाललेलं असतं जणू! जसं आम्ही कधी कामच केलं नाही...”
आणि माझ्या बायकोला सांगायला गेलो तर ती सरळ तोंड करून बोलायलाही तयार नव्हती. फक्त शांतपणे सगळं ऐकत होती.
अशावेळी... मला आईचंच बोलणं खरं वाटलं. खरंच तर आहे... आईसुद्धा किती काम करायची आधी... पण माझ्या बायकोचं मात्र वेगळंच नाटक आहे... पण मी तरी काय करणार? दोघींमध्ये भरडला जाणार तर मीच होतो. म्हणून बायकोशी बोलायला तिच्या मागे गेलो.
मीही रागात बोलून गेलो,
“अगं, कितीसं काम असतं? मला बघ... सकाळपासून बाहेर असतो, दिवसभर काम करतो... संध्याकाळी थोडा आराम करावा म्हटलं तर तुझी कटकट सुरू असते.”
पण बायको काही ऐकणाऱ्यांपैकी नव्हती. समोर आईही नव्हती की बोलताना तिला काही संकोच वाटेल. ती म्हणाली,
“ठीक आहे पतिदेव... एक दिवस तुम्ही माझं आयुष्य जगून बघणार का?”
मीही म्हणालो,
“ठीक आहे! करीन. त्या दिवशी तू काहीच काम करू नकोस. फक्त बसून राहा. दिवसभर इकडे-तिकडे शेजाऱ्यांकडे जाणं, उरलेल्या वेळेत माहेरच्यांशी फोनवर बोलणं... हे सगळं बंद केलंस तर दोन तासांत काम संपेल.”
बायको एकदा हसली आणि म्हणाली,
“नाही नाही पतिदेव... तुम्हाला पूर्ण घरकाम करायचं नाहीये. फक्त माझ्या वाट्याचे तीनच काम करायचे आहेत.”
“फक्त तीन कामं...? सांग बरं कोणती?” मी विचारलं.
ती म्हणाली,
“पहिलं काम — मी कपडे धुवेन, तुम्ही फक्त ते वाळत टाका.
दुसरं — मी भांडी घासेन, तुम्ही फक्त ती जागेवर लावा.
आणि तिसरं — मी घर झाडून-पुसून घेईन, तुम्ही फक्त कचरा टाका.”
मी मिश्किल हसत म्हणालो,
“तू पण ना... तुला आरामाची चांगली संधी देत होतो, तीच घालवते आहेस. चालेल, उद्या तयार राहतो.”
---
सकाळ झाली. सगळ्यांचा चहा-नाश्ता झाला. त्यानंतर बायकोने सगळी भांडी धुवून टोपलीत ठेवली.
मी ती लावायला पुढे गेलो, तर ती म्हणाली,
“अहो अहो पतिदेव... आधी भांड्यांवरचं पाणी निथळू द्या. मग हे चिनी कप तिकडे समोर ठेवायचे. आणि हो, आधी कपड्याने पुसून घ्या. या प्लेट्स सिंकखालच्या कपाटात ठेवायच्या. त्या वेगळ्या-वेगळ्या ठेवा, एकावर एक ठेवल्या तर त्यात ओलसरपणा येतो. आणि ही चहाची किटली खिडकीजवळ उन्हात ठेवा म्हणजे वास जाईल. आणि आईंचा औषधाचा ग्लास त्यांच्या खोलीत नीट कोरडा करून ठेवायचा.”
मी तिचं सगळं ऐकत भांडी लावायला लागलो. भांडी लावत लावत पंधरा मिनिटं कधी गेली समजलंच नाही. काय करणार... चिनी मातीची भांडी होती... जपून ठेवावी लागत होती. फुटली तर? रोज आई माझ्या बायकोला बोल लावते... आज मला ऐकावं लागू नये म्हणून भीती वाटत होती.
---
नंतर बायकोने झाडू काढला आणि कचरा तसाच ठेवला.
मी कचरा टाकायला निघालो तर ती म्हणाली,
“पतिदेव, कचरा वेगळा टाका. ओला कचरा वेगळा, सुका वेगळा. आणि किचनमध्ये भाजी साफ केली होती ना, त्यातलं गवत, देठ वगैरे खाली गाईला टाका. सोबत कालच्या पोळ्याही ठेवल्यात.”
मी एका हातात ओला कचरा, दुसऱ्या हातात सुका कचरा आणि किचनचा कचरा घेऊन अंगणात आलो. कॉलनीत आधीपासूनच गाय उभी होती. तिला पोळी खाऊ घालायला लागलो तर तिने थोडं खाल्लं, थोडा कचरा पसरवला. पुन्हा झाडू घेऊन साफ करावं लागलं.
कचऱ्याच्या गाडीचा आवाज येत होता — “गाडीवाला आला, घरचा कचरा काढा...” पण गाडी अजून आली नव्हती. बहुतेक प्रत्येक ठिकाणी थांबत येत असावी. म्हणून बाहेर उभा राहिलो. एकटं उभं राहून कंटाळा आला म्हणून मोबाईल काढून बोलायला लागलो.
पाच... दहा मिनिटांनी गाडी आली. कचरा टाकून परत घरात आलो.
अजून १५-२० मिनिटं गेली होती...
---
थोडा वेळ बसलो. बायको सगळ्या खोल्यांतून कपडे गोळा करत होती धुण्यासाठी.
मी विचार केला, “आता कपडे धुवायला वेळ लागेल, तोपर्यंत थोडा आराम करतो.”
इतक्यात बाथरूममधून धपाधप आवाज यायला लागला. असं वाटत होतं जणू ती कपडे धुत नव्हती... दिवसाचा सगळा राग त्यांच्यावर काढत होती.
मी रागाने बाथरूमजवळ गेलो आणि म्हणणारच होतो,
“राग काढायचाच असेल तर माझ्यावर काढ...”
तेवढ्यात पाहिलं तर ती माझीच जीन्स घासत होती, ज्यावर काल मी भाजी सांडली होती.
मी माझे शब्द तोंडातच गिळले...
---
थोड्या वेळाने ती दोन बादल्या कपडे घेऊन आली आणि म्हणाली,
“हे वाळत टाका. आणि हो, ही साडी सावलीत टाका, रंग जातो तिचा. आणि हे शर्ट-पॅन्ट उलटे करून टाका म्हणजे रंगही जाणार नाही आणि ऊनही लागेल. सगळ्या कपड्यांना क्लिप लावा. आणि दूर-दूर टाका म्हणजे नीट वाळतील. कधी पाऊस येईल सांगता येत नाही.”
मी फक्त मान हलवत छतावर गेलो.
छतावर जाऊन एकेक कपडा वेगळा टांगायला लागलो. पॅन्ट उलटी केली... शर्टची बटणं लावली... कपडे टांगताना पाहिलं तर कॉलरवरचे आणि पॅन्टवरील डाग गेले होते. मनोमन बायकोचं कौतुक वाटलं.
मुलांचे छोटे छोटे कपडे वाळत घालणं तर फार अवघड वाटलं. जसा टाकायचो तसाच वाऱ्याने उडायचा. एका हाताने कपडा पकडायचा, दुसऱ्याने क्लिप लावायची. कसाबसा अर्धा तास गेला.
इतक्यात शेजारच्या आजीही त्यांच्या छतावर आल्या. आता त्यांना नमस्कार करणं भाग होतं. दुर्लक्ष करून निघालो असतो तर काय विचार केला असता कोण जाणे! म्हणून त्यांच्याशीही थोडं बोलावं लागलं.
---
खाली आलो तर बायकोने स्वयंपाक करून ठेवला होता. सिंकमध्ये पुन्हा भांड्यांचा ढीग जमा झाला होता. कढई, तवा, चमचे, मिक्सरचा जार, लाटणं, पाट... मध्येच चहाचे कप पुन्हा आलेले.
तिने सगळी भांडी धुतली आणि सगळ्यांना जेवण वाढायला लागली.
सगळे जेवले आणि पुन्हा सिंकमध्ये भांड्यांचा ढीग जमा झाला.
मी सकाळची भांडीच लावत होतो, तोपर्यंत तिने दुसरी भांडी धुवून ठेवली आणि दयाळूपणे म्हणाली,
“आता राहू द्या... दुपारी लावा.”
मी पाहिलं... सकाळपासून ती एकदाही बसली नव्हती. फोनलाही हात लावला नव्हता.
मी थोडं हसत विचारलं,
“काय गं, आज एकदाही फोन घेतला नाहीस?”
ती हलकंसं हसून म्हणाली,
“तुम्हालाच तर फोन करते मी... आज तुम्ही घरी आहात, मग कशाला करू?”
मी म्हणालो,
“का? माहेरी कोणाला फोन करत नाहीस? आई तर म्हणते दिवसभर मोबाईलवर असतेस.”
ती निर्विकारपणे म्हणाली,
“माझ्यासारख्याच माहेरच्या बायका पण कामात व्यस्त असतात. सणासुदीला थोडं बोलणं होतं. आई म्हणाल्या ते बरोबरच म्हणाल्या... मुलांच्या ट्युशनवाले, गॅसवाले, डिशवाले, कुरिअरवाले... अर्धी कामं आजकाल मोबाईलवरच होतात.”
---
मुलं शाळेतून आली. तिने पुन्हा गॅस लावला. मुलांच्या आवडीचं खायला केलं. टिफिन पुन्हा सिंकमध्ये आले. प्लेट्स जमा झाल्या. तिने त्या धुतल्या.
मग पुन्हा झाडू काढला. दुसऱ्यांदा घर झाडत होती.
इतक्यात आईचा आवाज आला — “चहा कर!”
ती चहा करायला गेली. पुन्हा चहाची भांडी सिंकमध्ये.
मुलांचे शाळेचे कपडे बाथरूममध्ये आले. ती पुन्हा कपडे धुवायला लागली. दुसऱ्या दिवशी शाळेत तेच घालायचे होते.
मी किचनमध्ये धुतलेल्या भांड्यांचा ढीग पाहूनच घाबरत होतो... इतक्यात ती मुलांचे कपडे घेऊन आली आणि म्हणाली,
“हे वाळत टाका.”
---
असं करत करत पूर्ण दिवस गेला.
संध्याकाळचा नाश्ता झाला. पुन्हा भांडी.
रात्रीचं जेवण झालं. पुन्हा भांडी.
संपूर्ण दिवस हेच चक्र सुरू होतं.
आता मीच या कामाला कंटाळलो होतो.
खरंच... मला बायकोची दया आली.
ज्या गोष्टी फक्त वाळत टाकताना मला आळस येत होता, त्या ती आधी धुते, घासून चमकवते, मग वाळवते, नंतर इस्त्री करून जागेवर ठेवते.
रोज रोज हे सगळं करून ती किती कंटाळली असेल...
आणि काही वर्षांपासून तर तिने माझ्याकडे काही मागणंसुद्धा बंद केलं होतं.
कुठेतरी तिच्या या शांत स्वभावामुळे मलाच ती गर्विष्ठ वाटायला लागली होती...
---
रात्री मी तिला म्हणालो,
“आज मला कळलं तू दिवसभर किती काम करतेस... आणि किती नीट करतेस.”
“पण एक सांग... तू माझ्या आईशी नीट बोलत का नाहीस? त्यांची काळजी घेतेस तरी त्या तुझ्यावर रागावलेल्या का असतात?”
ती म्हणाली,
“आज तुम्ही एक दिवस माझ्या वाट्याचं थोडंसं काम केलं, तेव्हा तुम्हाला माझी अवस्था कळली.
आईजी तर हे आयुष्य स्वतः जगलेल्या आहेत. रोज स्वतःच्या डोळ्यांनी मला पाहतात... तरी समाधानी नसतात. चुका काढतात. माझ्या शरीराच्या वेदनांना नाटक समजतात...
सांगा बरं... मी किती वेळा स्वतःची सफाई देत राहू?
बोलले तर उद्धट...
न बोलले तर गर्विष्ठ...
त्यांचं एकच असतं — ‘आमच्या काळात... आमच्या काळात...’
पण पतिदेव... काळ निघून जातो... बदलतोही.
पण आयुष्य जगायचं असतं... ते कोणाच्या मर्जीप्रमाणे बदलत नाही.
त्यांच्या काळात गोष्टी वेगळ्या होत्या... आपल्या काळात वेगळ्या आहेत...
त्या अजूनही भूतकाळात जगत आहेत... आणि मी आजमध्ये जगते आहे.”
---
एका स्त्रीला वाईट तेव्हा वाटत नाही जेव्हा एखादा पुरुष तिला कमी लेखतो... कारण पुरुषाला कदाचित कल्पनाही नसते की जबाबदाऱ्या पेलता पेलता ती त्याच्या वयापेक्षाही कितीतरी मोठी झालेली असते.
जेव्हा तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं, तेव्हाच तिचं लग्न लावलं जातं...
जेव्हा ती घर सांभाळायला शिकते, तेव्हाच मुलांची जबाबदारी येते... आणि ती स्वतः अजून मनाने लहानच असते...
आणि जेव्हा ती घर आणि मुलं दोन्ही सांभाळायला शिकते...
तेव्हा तिच्याकडून अपेक्षा केली जाते की आता पैसेही कमवावेत...
पण तेवढा आत्मविश्वास तिच्यात उरलेला असतो का?
तो तर कधीच तिच्या जवळच्यांनी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये उणेदुणे काढून संपवलेला असतो...
आणि ती समाजात फक्त उपहासाचा विषय बनून राहते... फक्त म्हणून की ती चार भिंतींच्या आत राहते.
खरं तर, हे आमच्या स्त्रियांचं रोजचंच आयुष्य आहे...
म्हणूनच एका वेळेनंतर आम्ही स्वतःबद्दल स्पष्टीकरण देणं सोडून देतो...
आणि शांततेलाच आपला दागिना मानून अंगावर चढवतो...
स्त्रीला खर्या अर्थाने वाईट तेव्हा वाटतं... जेव्हा एक स्त्रीच तिची किंमत ओळखत नाही...
बायकोचं बोलणं ऐकून मी नि:शब्द झालो...
मयुरी 🖋️
Cp