17/04/2020
“लाली...!”
दचकलात का? नाही ना? होय मीच लाली बोलतेय, खूप दिवसांपासून मला आपल्याशी बोलावं वाटत होत.. आणि आज तो उजाडलाय!
आयुष्य बघा कस सरसर ऽऽऽ पुढं जात असत नाही का? तसा माझा जन्म इथलाच, म्हणजे आदित्य विवाझ सोसायटी च्या आसपास झाला होता. आपल्या या सुंदर ईमारतीचे मजले जसेजसे वर चढत होते, तसेतसे माझे एकएक नातलग -परिवार संपत चालले होते. उघडया डोळयांनी हे सार दुःख पचवत मी लहानाची मोठी होत होते... कालांतरानी मलाही, तीन चार अपत्य झाली. कितीही पाजलं तरी दूधाचा पांनहा आटत नव्हता. बांधकाम साईटवरची सर्वच कामगार मंडळी गणपत, हणमंत, राजू आमची खूप काळजी घ्यायचे. त्यामुळं माझा सोन्या सारखा संसार अवघा फुलला चालला होता....
पण, का कुणास ठाऊक, अचानक माझ्या या सुखी संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली... आणि एकापाठोपाठ एक दुःखांचे डोंगर माझ्यावर कोसळू लागले......माझ्या एका बछडयाला अचानक कोणीतरी एकानं त्याच्या कारमधून पळवून नेलं, दुसरयाला सापानं दंश करून ठार केलं आणि उरलेला तिसरा माझ्या डोळ्यांदेखत आपल्या सोसायटीच्या समोरील रोडवर कार खाली चिरडून गेला....
जणू दुःखांच आभाळच फाटल होतं, काळीज पिळवटून गेल...रडतांना गळ्यातून आवाजच निघत नव्हता आणि डोळ्यातील सारी आसवं आटून गेली होती.... वाटत होतं, जीवाच्या आकंतान पळत सुटावं ऽऽऽ आणि ...माझ्या लहानग्यां बछडया सारखं जीवन संपवून परत आपल्या सर्व बछडयांना बिलगायला जावं....!
दिवस मागे पडत होते, Luke अंकलचा हात मायेनं पाठीवरून फिरू लागला. ते रोज चार घास भरवू लागले, त्यांच्या या आपुलकींन, मायेनं मला जगणयाची हिंमत मिळाली. अशीच माया आणि माझे सतत लाड वाॅचमन आकाश नी केले. सोसायटीतील लहान मुलं जेव्हां खेळत बागडत असतात तेंव्हा आधींच्या आठवणींनी मन माझं शहारून- बहरून जात...! तेव्हा वाटतं हे जगणे सुंदर आहे. या सर्व गोष्टींमुळे, आयुष्याचं फाटलेलं सारं आकाश या जिव्हाळ्यामुळं परत गुंफून सांधल जावू लागल...... आणि माझं प्रचंड दुःख दिवसेंदिवस हळुहळू धुसर होवू लागलं.
या अपार प्रेमाच्या नवसंजीवनी मुळे मी पुनःश्च बेभान होवून ‘आदित्य विवाझ सोसायटी‘ च्या सेवेत एक खंदा पहारेकरी, निष्णात शिलेदार म्हणून सक्रीय झाले.. तब्बल साडेतीन एकरावरील ही सर्वात सुंदर सोसायटी, अॅमिनीटी यांवर आता फक्त माझ्या एकटीची हुकुमत चालते. रस्त्यासमोरून प्रत्येक येणारा- जाणारा यांच्यावर माझी प्रचंड दहशत आहे... कारण, खाल्ल्या मीठाला जागणारी आमची औलाद आहे. रात्रंदिवस सतत डोळ्यात तेल घालून माझा हा ‘आदित्य विवाझ गड’ लढवते. यासाठी गणोरकर काका, सर्व सिकयुरीटी मंडळी माझी सतत खुप काळजी घेतात.
कोरोनाच संकट आलं आहे. जवळची माणसं एकमेकानां बघून लांब पळत आहेत. पाहून वाटत माणसापरिस आम्हीच बरी...।जीव प्रत्येकालाच प्यारा आहे हो, पण मला वाटतं प्रेम हे एकतरफी नसावं. प्रामाणिकपणा, ईमानदारी आमच्या रक्तात खोलवर भिनली आहे. तीन- तीन, चार- चार बेडरूमच्या तुमच्या फ्लॅटची रखवालदारी करण्यासाठी मी कडक उन्हांत, कडाक्याच्या थंडीत, मुसळधार पावसात खंबीरपणे उभी आहे....का? कशासाठी? आणि यासाठी कसाबसा आसरा, हक्काचे दोन चार घास मला नको का? अहो मला पण कांही भावना आहेत. तिरस्कार न करतां कधीतरी थोडं आपुलकीनं, माझ्यावळ या, माझ्या डोळ्यात पाहा, कधीतरी पाठीवरून मायेचा हात फिरवा, लाडानं ये लाली ऽऽऽ ये लाली ऽऽऽ म्हणा ... अहो हजांरो हत्तींच बळ येईल हो माझ्या अगांत.
लक्षात ठेवा, आपणा सर्वांच्या १०८ फ्लॅटसची मी गडकरी आहे.... तो कोरोना का काय आलाय ना? काळजी करू नका. त्याला गेटच्या आत येवू देणार नाही.... हा शब्द आहे माझा..!अहो मला तो नुसता दिसु तर दया... आई शप्पथ मी त्याला उभा आडवा फाडून काढते....!
त्यासाठी पाठीवर हात ठेवा आणि फक्त “लाली लढ म्हणा ...!!”
आपली,
लाली...!
- राजेंद्र कोरे- Architect,
आदित्य विवाझ सोसायटी
रावेत, पुणे. दि17/04/2020